बीड मधल्या शेतकऱ्यांची दिवाळी
#Beed
#कष्ट
#कापूस_शेतकरी
#गेवराई
माझ्या तालुक्यात माझ्या गावात दरवर्षी दिवाळी अशीच साजरी होते. किराणा भरून असतो, फटाक्यांची वाट सर्वजण पाहत असतात, नवीन कपडे, पण तो शेतकरी त्याला सर्व आर्थिक नियोजन लावायचं असतं, आपल्या लेकराला आपल्या कुटुंबाला दिवाळीचा सण साजरा करण्यासाठी कसाबसा वेळ आणि पैसा या दोन्हींचं देखील खूप काटेकोरपणे नियोजन लावावं लागतं.
अंधार पडल्यानंतर रस्त्याने कापसाचे भोत भरून जात असताना ह्या बैलगाड्या बघितल्या आणि मला माझे लहानपणापासूनचे दिवस आठवले.
कापसा वाला शेतकरी जूनच्या पहिल्या आठवड्यापासून पाऊस पडल्यापासून ते उन्हाळ्यापर्यंत एक दिवस देखील कसली उसंत न घेता फक्त कष्ट करताना मी पाहिला.
आमचा बीड जिल्हा तसा दुष्काळग्रस्त.
इथली शेती बहुतांश कोरडवाहू जिरायती थोडीफार शेती जिथे दरवर्षी विहीर आणि बोर घेऊन शेतकरी आणखी नाही मोठी आशा घेऊन पाण्यासाठी प्रयत्न करतो न थकता न बोर होता. शेतीतून मिळालेला शिल्लक राहिलेला थोडाफार पैसा तो शेतातील पाण्यासाठी खर्च करताना बघितला आहे.
इथला शेतकरी आपल्या लेकरांना शिकवण्यासाठी देखील पैसा खर्च करतो, शिक्षण खूप महागले आहे, बीड जिल्हा हा देव देवळांचा जिल्हा आहे परंतु हॉटेल धाब्यांचा देखील जिल्हा झालेला आहे. व्यसनाधीनतेचे प्रमाण देखील खूप वाढलेले आहे.
बेरोजगारी, कर्जबाजारीपणा, लग्न न होणे, असे अनेक प्रश्न न सुटणारे प्रत्येकाच्या समोर उभे आहेत.
प्रत्येक पिढीला या प्रश्नांना सामोरे जावं लागत आहे. बीड जिल्हा उद्योग धंद्यांमध्ये पुढे जाऊ शकत नाही कारण इथे राजकारण आणि राजकीय नेत्यांच्या सभांचे केंद्र बनले आहे. इथली सामाजिक व्यवस्था संपूर्णपणे कोलमडून जात आहे.
इथल्या कष्टकरी शेतकरी कामगारांचे प्रश्न आजपर्यंत सुटले नाही आणि इथं त्यावर कोणी चकार शब्द देखील काढत नाही.
बीड जिल्ह्यातील तसेच माझ्या गेवराई तालुक्यातील सर्व कष्टकरी जनतेला या दिवाळीला आणि पुढील प्रत्येक दिवाळीला माझ्याकडून तेजोमय आणि मंगलमय शुभेच्छा.

0 टिप्पण्या:
टिप्पणी पोस्ट करा
याची सदस्यत्व घ्या टिप्पणी पोस्ट करा [Atom]
<< मुख्यपृष्ठ