शुक्रवार, २४ ऑक्टोबर, २०२५

टीईटी अर्ज भरला नाही घाबरू नका,आता ही परीक्षा देऊ शकता.

 केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा 2025, येथे पहा
October 24ऑक्टोबर, 2025 
CTET December 2025 केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) लवकरच केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (CTET) डिसेंबर २०२५ साठीची अधिसूचना जाहीर करणार आहे. या परीक्षेची लाखो उमेदवार आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर उमेदवारांना ती सीबीएसईच्या अधिकृत संकेतस्थळावर — ctet.nic.in — येथे पाहता येईल. सीटीईटी परीक्षा नेहमीप्रमाणे दोन टप्प्यांत घेतली जाणार असून, पेपर १ इयत्ता १ ते ५ वीच्या शिक्षकांसाठी आणि पेपर २ इयत्ता ६ वी ते ८ वीच्या शिक्षकांसाठी असेल. पात्र उमेदवारांना केव्हीएस, एनव्हीएस, आणि एपीएस सारख्या केंद्रीय संस्थांमध्ये नोकरीची संधी मिळू शकते.

सीटीईटी तसेच महाराष्ट्र मधील टीईटी या दोन्ही परीक्षा समक्ष आहेत.
    दोन्हींचे गुण तसेच या शिक्षक पात्रता परीक्षा आत्ताच एक सप्टेंबर च्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार आरटीआय 2009 नुसार शिक्षक पात्रता परीक्षा दोन वर्षांमध्ये पात्र होणे बंधनकारक केलेले आहे.


सीटीईटी अधिसूचना आणि परीक्षा वेळापत्रक

CTET परीक्षा दरवर्षी दोन वेळा — जुलै आणि डिसेंबरमध्ये CBSE द्वारा आयोजित केली जाते. याचा मुख्य उद्देश देशभरात योग्य आणि प्रशिक्षित शिक्षकांची निवड करणे आहे. या परीक्षेद्वारे सरकार उमेदवारांची शैक्षणिक क्षमता, आकलन आणि शिकवण्याची योग्यताही तपासते. CTET राष्ट्रीय स्तरावरील पात्रता परीक्षा आहे, जी शिक्षक भरतीसाठी किमान आवश्यक योग्यतेचे प्रमाण ठरवते. परीक्षा दोन पेपरमध्ये होतात: पेपर १ (प्राथमिक शिक्षक) आणि पेपर २ (उच्च प्राथमिक शिक्षक). प्रत्येक पेपरमध्ये १५० गुणांची प्रश्नावली असते आणि किमान ६०% गुण मिळवणं आवश्यक असतं.
प्राथमिक शिक्षक होण्यासाठी पात्रता

प्राथमिक स्तरावर शिक्षक होण्यासाठी उमेदवारांची खालील पात्रता असावी लागते उमेदवारांनी १२ वी मध्ये किमान ५०% गुणांसह उत्तीर्ण झाले असावे. त्यानंतर त्यांना ‘डिप्लोमा इन एलिमेंटरी एज्युकेशन’ (D.El.Ed) या दोन वर्षांच्या कोर्सची शिकवणी पूर्ण केलेली असावी. किंवा १२ वी मध्ये ५०% गुणांसह चार वर्षांचा B.El.Ed कोर्स पूर्ण केलेला असावा. तसेच, १२ वी मध्ये ५०% गुणांसह दोन वर्षांचा ‘डिप्लोमा इन स्पेशल एज्युकेशन’ (विशेष शिक्षण) कोर्स देखील पूर्ण केलेला असावा. याशिवाय इतर कोणत्याही शैक्षणिक पात्रतेचा विचार केला जात नाही.
उच्च प्राथमिक शिक्षकासाठी पात्रता

जे उमेदवार इयत्ता ६ ते ८ साठी शिक्षक होऊ इच्छितात, त्यांच्यासाठी खालीलपैकी एक पात्रता अनिवार्य आहे. उमेदवारांनी कोणत्याही विषयात पदवी (Graduation) घेतलेली असावी, सोबत डी.एल.एड. किंवा ५०% गुणांसह बी.एड. ही पात्रता असावी. त्याचप्रमाणे, १२वी मध्ये ५०% गुणांसह चार वर्षांचा बी.एल.एड. किंवा बी.ए./बी.एस्सी.एड. किंवा बी.ए.एड./बी.एस्सी.एड. हा पर्याय देखील मान्य आहे. तसेच, पदवी मध्ये ५०% गुणांसह विशेष शिक्षणासाठी बी.एड. देखील योग्य मानली जाते. यामध्ये विविध शैक्षणिक पात्रतेचे पर्याय उमेदवारांसाठी उपलब्ध आहेत.

अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन

सीटीईटी डिसेंबर २०२५ साठी अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने केली जाईल. उमेदवारांनी ctet.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन “Apply Online” लिंकवर क्लिक करावी. नवे उमेदवार नोंदणी करून अर्ज क्रमांक मिळवू शकतात. अर्ज फॉर्ममध्ये वैयक्तिक, शैक्षणिक आणि संपर्क माहिती भरा, आणि फोटो व स्वाक्षरी अपलोड करा. अर्ज शुल्क ऑनलाइन पद्धतीने डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंगद्वारे भरा. अर्ज सबमिट केल्यानंतर, कन्फर्मेशन पेज डाउनलोड करून त्याची प्रिंट आउट घेणे आवश्यक आहे.

 
परीक्षा पद्धती आणि CTET प्रमाणपत्र

परीक्षा ऑनलाईन किंवा ऑफलाइन पद्धतीने घेतली जाऊ शकते, याबाबत निर्णय CBSE घेईल. प्रवेशपत्र (Admit Card) संबंधित नोटिफिकेशन जाहीर झाल्यानंतर काही आठवड्यांनी उपलब्ध होईल. परीक्षेत एकूण १५० प्रश्न असतील, आणि प्रत्येक प्रश्नाचे मूल्य १ गुण असेल. नकारात्मक गुणांकनाचा (Negative Marking) उपयोग केला जाणार नाही. उमेदवारांनी परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर त्यांना CTET प्रमाणपत्र दिले जाईल, जे आयुष्यभरासाठी वैध राहील. याआधी CTET प्रमाणपत्र ७ वर्षांसाठी वैध होते. हा बदल विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण ठरू शकतो.

सोमवार, २० ऑक्टोबर, २०२५

बीड मधल्या शेतकऱ्यांची दिवाळी

#Beed
#कष्ट 
#कापूस_शेतकरी 
#गेवराई
      माझ्या तालुक्यात माझ्या गावात दरवर्षी दिवाळी अशीच साजरी होते. किराणा भरून असतो, फटाक्यांची वाट सर्वजण पाहत असतात, नवीन कपडे, पण तो शेतकरी त्याला सर्व आर्थिक नियोजन लावायचं असतं, आपल्या लेकराला आपल्या कुटुंबाला दिवाळीचा सण साजरा करण्यासाठी कसाबसा वेळ आणि पैसा या दोन्हींचं देखील खूप काटेकोरपणे नियोजन लावावं लागतं. 
         अंधार पडल्यानंतर रस्त्याने कापसाचे भोत भरून जात असताना ह्या बैलगाड्या बघितल्या आणि मला माझे लहानपणापासूनचे दिवस आठवले. 
       कापसा वाला शेतकरी जूनच्या पहिल्या आठवड्यापासून पाऊस पडल्यापासून ते उन्हाळ्यापर्यंत एक दिवस देखील कसली उसंत न घेता फक्त कष्ट करताना मी पाहिला.
आमचा बीड जिल्हा तसा दुष्काळग्रस्त. 
इथली शेती बहुतांश कोरडवाहू जिरायती थोडीफार शेती जिथे दरवर्षी विहीर आणि बोर घेऊन शेतकरी आणखी नाही मोठी आशा घेऊन पाण्यासाठी प्रयत्न करतो न थकता न बोर होता. शेतीतून मिळालेला शिल्लक राहिलेला थोडाफार पैसा तो शेतातील पाण्यासाठी खर्च करताना बघितला आहे. 
      इथला शेतकरी आपल्या लेकरांना शिकवण्यासाठी देखील पैसा खर्च करतो, शिक्षण खूप महागले आहे, बीड जिल्हा हा देव देवळांचा जिल्हा आहे परंतु हॉटेल धाब्यांचा देखील जिल्हा झालेला आहे. व्यसनाधीनतेचे प्रमाण देखील खूप वाढलेले आहे. 
       बेरोजगारी, कर्जबाजारीपणा, लग्न न होणे, असे अनेक प्रश्न न सुटणारे प्रत्येकाच्या समोर उभे आहेत. 
       प्रत्येक पिढीला या प्रश्नांना सामोरे जावं लागत आहे. बीड जिल्हा उद्योग धंद्यांमध्ये पुढे जाऊ शकत नाही कारण इथे राजकारण आणि राजकीय नेत्यांच्या सभांचे केंद्र बनले आहे. इथली सामाजिक व्यवस्था संपूर्णपणे कोलमडून जात आहे. 
        इथल्या कष्टकरी शेतकरी कामगारांचे प्रश्न आजपर्यंत सुटले नाही आणि इथं त्यावर कोणी चकार शब्द देखील काढत नाही. 
      बीड जिल्ह्यातील तसेच माझ्या गेवराई तालुक्यातील सर्व कष्टकरी जनतेला या दिवाळीला आणि पुढील प्रत्येक दिवाळीला माझ्याकडून तेजोमय आणि मंगलमय शुभेच्छा.

बुधवार, ८ ऑक्टोबर, २०२५

आरक्षण आणि शिक्षण



     

आज महाराष्ट्रामध्ये जो जातीसाठी,प्रवर्गासाठी आणि आरक्षणासाठी सरकारच्या विरोधात सर्वांनी एकत्रित येऊन जाब विचारण्याऐवजी आपापसात भांडत आहेत.

     महाराष्ट्र एक सुसंस्कृत , विकसनशील राज्य आहे. महाराष्ट्रामधील शेतकरी कष्टकरी वारकरी बहुतांश गोरगरीब जनता या ठिकाणी राहते.
         आज इथे प्रत्येक जण जातीच्या चष्म्या मधून एकमेकांना पाहत आहे. 
      आज कित्येक दशकांपासून सरकार नोकर भरती करत नाही. सर्व नागरिकांचे काय म्हणणे असते तर आपल्याला आपल्या मूलभूत गरजा पूर्ण करून एक चांगलं जीवन जगता यावं आपल्या कुटुंबांने अन्न वस्त्र निवारा आरोग्य आणि शिक्षण या मूलभूत गरजांसाठी संघर्ष करावा असे कोणाला वाटत नाही. 
     महाराष्ट्रात राहणाऱ्या नव्हे स्वतंत्र भारतामध्ये राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्याचं कर्तव्य सरकारची नाहीये का?
          भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अमृत महोत्सव झाल्यानंतर तब्बल 75 वर्षानंतर बीडला रेल्वे येते महाराष्ट्राचे मध्यवर्ती ठिकाण. ऊस कापूस तूर सोयाबीन इथले मुख्य पीक इथे बाजारपेठ नाही ना उद्योगधंदे बेरोजगार तरुणांचा हा बीड जिल्हा तरीदेखील इथे एकच काम शिकणे. लाज वाटली पाहिजे इथल्या राज्यकर्त्याला इतक्या उशिराने रेल्वे येते थाटामाटा मध्ये मुख्यमंत्री त्याचे उद्घाटन करतात पण पुढे काय? इथल्या जनतेला एकच वाटते यांच्यापेक्षा इंग्रज बरे होते. कारण ते आमचे नव्हते ते इथले नव्हते पण त्यांनी महाराष्ट्रामध्ये धरण बांधली ,रेल्वे आणल्या, मात्र इथले फुले शाहू आंबेडकर चळवळीचे म्हणून घेणारे पुरोगामी विचार सांगणारे बोल घेवडे काय करतात?
     वाटतील ते शिक्षण घेऊन नोकरी लागावी यासाठी संपूर्ण आयुष्य घालवणारे पिढ्यानपिढ्या इथे जन्म घेतात आणि मरतात.
        इथे अनेक राजकीय घराणे राज्य करत आहेत. मराठवाड्यामध्ये विशेषता बीड जिल्ह्यामध्ये शिक्षण संस्था आणि शिक्षण यासाठी लाखो रुपये खर्च करणारे लोक आहेत. एलकेजी युकेजी साठी एवढा भरमसाठ खर्चा असावा? 
      मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिकार असा कायदा करणाऱ्या सरकारने कुठे मोफत आणि सक्तीचे शिक्षण दिले? 
         आज जो तो आरक्षण मागत आहे, ते कशासाठी? 
      आरक्षण सर्वात आगोदर मुलांना शिकवण्यासाठी येणारा खर्च वाचावा म्हणून असावे वाटते. अहो इथलं कोणत्याही शाळेतलं आणि कॉलेजमधलं शिक्षण मोफत करा. आरक्षणाचे फायदे कोणालाच मिळणार नाहीत. कारण इथे शिक्षण घेण्यासाठी इथल्या शिक्षण संस्था ह्या सरकारच्या नाहीत तर सरकार चालवणाऱ्याच्या आहेत.
     तुम्हाला आरक्षण प्रत्येकाला मिळाली तरी काही ना काही फीस ही भरावीच लागणार आहे. 
शिक्षण घेण्यासाठी जो की मूलभूत अधिकार आहे आणि माणसाची मूलभूत गरज सुद्धा तर सरकारने यासाठी ती स्वतःची जबाबदारी आहे हे भानावर येऊन आनंदाने उचलावी. 
     इथून पुढे लोकांनी आपापसामध्ये भांडण करणे सोडून देऊन सरकारला धारेवर धरा.
      संविधानाला सर्वोच्च मानणारे आपले राज्यकर्ते हे खूप नैतिक पणे त्या संविधानाची शपथ घेऊन त्याची अंमलबजावणी करतात की पायदळी तुडवतात हे तुम्ही उघड्या डोळ्यांनी बघत असून सुद्धा तुम्हाला कसे काय  काहीच वाटत नाही.
      आरक्षण हे तर गरजवंतांना द्याच पण सर्व शिक्षण सर्वांना मोफत करा. त्या त्या शिक्षणाानुसार त्यांना नोकऱ्या उपलब्ध करून द्या रोजगार उपलब्ध करून द्या उदगधंदे    निर्माण करा.  
      जनतेने एकच मागणी केली शिक्षण मोफत ते कोणत्याही शाळेत आणि कॉलेजमध्ये तर 50 टक्के भ्रष्टाचार इथेच थांबेल. आज भारतातील कित्येक लोक विदेशात जाऊन शिक्षण घेत आहेत, विदेशात जाऊन नोकरी करत आहेत. 
     चीन सारख्या देशाला आपण नाव ठेवतो तो देश भारतापेक्षा 50 वर्षे पुढे आहे तो फक्त शिक्षणाच्या बळावर. जपान सारखा देश बेचिराख होऊन देखील आज पुढे आहे तो फक्त शिक्षणामुळे.   
    आजही भारतातल्या शिक्षणाची गुणवत्ता ही खूप चांगली आहे फक्त ते मोफत नाही महाग आहे म्हणून जिथे महाग वाटते ते गुणवत्ता पूर्ण लोकांना वाटत आहे. 
       शिक्षण उत्पादनशील प्रयोगशील ,कृतिशील, सृजनशील, गुंतागुंतीचे प्रश्न सोडवण्यासाठी, तसेच संभाषण कौशल्य आणि सहयोग कौशल्य विकसित करण्यासाठी असते आणि ते फक्त आणि फक्त मोफत आणि सक्तीच्या शिक्षणातून होणार आहे.
       

सोमवार, २३ जून, २०२५

लॉ ऑफ attractions(आकर्षणाचा सिद्धांत)





लॉ ऑफ attraction.. भाग 1
(आकर्षणाचा सिद्धांत)

आपल्या टेंशन घेण्याने प्रश्न सुटणार नाहीत उलट प्रश्न वाढतील. जीवन हे बिना प्रश्नाचे नाही ,नसते. आयुष्यात  आपण हतबल झालो की आपण घाबरणार.आपण घाबरलो की आणखी दोन नवीन प्रश्न आपल्यासमोर उभे राहण्यासाठी तयारच असतात.आणि मग आपणच म्हणतो माझ्या मागे का असे?
मीच एवढा का अडचणीत?
मी कधी कोणाचे वाईट केले नाही,कधी कोणाचे वाईट चींतीले नाही मग तरी देखील मला का सामोरे जावे लागते एवढ्या अडचणींना?
    हे सर्व कोण्या ऐय्रागैय्रा व्यक्तीच्या मागे नसते,सामान्य माणसाच्या मागे सामान्य प्रश्न असतात.गरीब माणसाला आपल्या दृष्टीने  साधे प्रश्न असतात पण सेलिब्रिटी ला सेलिब्रिटी सारखे प्रश्न असतात.नेते मंडळींना त्यांच्या लेव्हल नुसार प्रश्न असतात. हे सर्व कोण नियोजन करत असेल ? ज्याच्या त्याच्या पात्रतेनुसार त्यांना समस्या ,सुख ,दुःख देणे. देव करत असेल का हे सर्व?
नाही देव नाही करत पण आपल्याला हताश झाल्यावर नक्की वाटेल की देवच हे सर्व समता ठेवण्यासाठी करत असेल.पण हे सर्वच व्यक्ती सोबत घडते  का? तर याच उत्तर नाही येते. मग काय कारण असेल या मागचे तर सतत सवय लागून जाते आपल्याला तसा विचार करण्याची? मनात भीती असते कसं होईल? कसं होईल? संभ्रम असतो मनात. तसे पाहिले तर एवढ्या पटकन विचारांनी माणूस बदलून जातं नाही आणि त्यामुळे परिस्थिती देखील बदलत नाही.
   हे सर्व मनाचे खेळ आहेत.खरे तर याला आकर्षणाचा सिद्धांत म्हणता येईल. लॉ ऑफ attraction.
              लॉ ऑफ attraction जाणून घेतले ,समजून घेतले तर सर्व सुरळीत वेवस्थित होईल.पुन्हा गाडी रुळावर येईल आणि आपण सकारात्मक विचार केला की गाडी रुळावरून धावेल.
         लॉ ऑफ attraction हा नियम शिकण्यासाठी जास्त काही करायची गरज नाही.यासाठी केवळ स्वतः ला वेळ द्यायचा, आपण आपल्यावर प्रेम करायचं ,आपण आपल्यावर विश्वास ठेवायचा, आपण आपल्याला समजून घ्यायचे, स्वताला कोस सोडून बाहेर पडता आले पाहिजे. आपण आपल्या मर्यादा आखत असतो नकळतपणे आणि मानसिक रुग्ण बनता बनता शारीरिक रुग्ण बनून जातो. 
  क्रमशः...

लेबल:

काय अपेक्षित असावं स्त्रियांना महिला दिनानिमित्त..


💐🙏 *आज जागतिक महिला दिन* 🙏
खरे तर निसर्गाने मनुष्यजन्म निर्माण केला. त्यामध्ये स्त्री आणि पुरुष या दोन जाती निर्माण केल्या. यामध्ये तितकासा बदल नाही. फक्त नवनिर्मितीसाठी स्त्रियांमध्ये बदल असला तरी तो बदल नक्कीच सहनशील ते साठीच आहे असा वाटतो.
        *जशा आज माणसाने कामावरून माणसांच्या जाती ठरवल्या त्याचप्रमाणे पुरुष आणि स्त्री यांना देखील निसर्गाने आपले स्वतःचे काम दिलेले आहे.*
         मनुष्याचे शारीरिक मानसिक तसेच सर्व अंगाने जर विचार केला तर तुझ्या कामांमध्ये तो ज्या ठिकाणी तुझ्या परिस्थितीमध्ये असतो त्याप्रमाणे तो घडतो. मग ती स्त्री असो की पुरुष. 
      अनेकदा स्त्रियांना वाटत असेल की मी स्त्री जन्मच का घेतला? 
कदाचित पुरुषांना समाधान वाटत असेल आपण पुरुष जन्म घेतला तो. एकंदरीत आपल्या देशामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये जाऊ द्या आपल्या घरामध्ये पुरुषप्रधान संस्कृती आहे हे तर सर्वांना मान्य आहे म्हणजेच या ठिकाणी स्त्रियांना तेवढे स्थान महत्त्व दिले जात नाही. 
     तरीदेखील ताराबाई शिंदे या त्यांच्या स्त्री-पुरुष तुलना या ग्रंथामध्ये असे लिहितात की नवऱ्याला योग्य मानसन्मान दिला गेला पाहिजे. 
       स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये असमानता कोणत्या गोष्टींमध्ये वाटते तर फक्त आदर, मानसन्मान, समजून घेणे, त्यांच्यामध्ये देखील क्षमता आहेत, स्त्री आणि पुरुष असे वेगळे समजून वागणूक  या काही गोष्टींमध्ये आजही भेदभाव आहे. 
      त्यामुळेच मधल्या काळामध्ये स्त्रीभ्रूणहत्या झाल्या. संत तुकाराम महाराजांनी त्यापूर्वी देखील सांगितले होते तरी देखील नवसे सायासे , वेगवेगळ्या गोष्टी मुलाच्या अट्टहासापोटी झाल्या आणि होत आहेत. 
   विज्ञान जरी सांगत असेल X आणि Y गुणसूत्रे तरीसुद्धा एवढ्या खोलात जाऊन त्या एका पुरुषासाठी एवढा खटाटोप का? त्या वंशाच्या दिव्यासाठी एवढा आटापिटा का? 
उभा विषय मुलासाठी आणि त्या पोरांसाठी प्रॉपर्टी आणि संपत्ती मिळवण्यामध्ये पूर्ण आयुष्य स्वतःकडे लक्ष न देणारी आई बाप म्हणजे स्त्री आणि पुरुष देखील या समाजामध्ये आहेत. 
   याउलट मुलगी वंशाचा दिवा होऊ शकते ,होते. ती दोन्ही कडील कुटुंबांना चांगलं सांभाळू शकते, आज आणि आजपर्यंतच्या इतिहासात जेलमध्ये स्त्रियांची संख्या कैदी म्हणून कमी आहे, व्यसनाधीनतेच्या विळख्यामध्ये स्त्रिया नगण्य आहेत, भ्रष्टाचार लूटमार दरोडे यामध्ये देखील पुरुषांच्या तुलनेत स्त्रिया कमी आहेत. थोडक्यात वाईट कामांमध्ये पुरुषांपेक्षा स्त्रिया या अल्प प्रमाणामध्ये आहेत. 
     तरीही स्त्रियांना दुय्यम स्थान स्त्रियांना नाकारले जाते स्त्रियांना सन्मान दिला जात नाही ही पुरुषप्रधान संस्कृती आपल्या देशाला तसेच आपल्या कुटुंबाला महासत्ता विकसित राष्ट्र विकसित कुटुंब याकडे घेऊन जाणारी नाही. 
      किरण बेदी सिंधुताई सपकाळ अशा अनेक महिला वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आपण पहात असलो तरी संघर्षाचं अतिउच्च टोक त्यांनी गाठलेले आहे तेव्हा कुठेतरी त्या वाईट परिस्थितीला नकारात्मकतेला पुरुषी होलिका या सर्वांचे दहन करून त्यांनी स्वतःच अस्तित्व कायम ठेवले म्हणून स्त्रिया कमी प्रमाणामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये तितक्याच प्रकर्षाने ताऱ्यासारख्या चमकत आहेत.
      जर खरोखरच आपल्याला जागतिक महिला दिन करायचा असेल तर आपण आपल्या घरामध्ये प्रत्येक दिवशी महिलां मधील सहनशीलता, समजूतदारपणा, त्याग सामंजस्य ,ममत्व, सृजनशीलता, नवनिर्मिती, सहयोगी भावना, नैतिकतेची कास, प्रेम सागर, आई बहीण मुलगी, पत्नी यामधील प्रत्येक रोल मॉडेल पुरुषांमध्ये ट्रान्सफर करता आले तर... दुसऱ्याची गुण घेता आले नाही तरी ओळखता येऊन त्याबद्दल कृतज्ञ राहिले तरी देखील आज समाजामध्ये न्यायालयामधील 50% खटले बरखास्त होतील.
      *महायुद्धाची सुरुवात ही घरातून होते हे कायम लक्षात असू द्या.*

*पुनश्च एकदा प्रत्येक स्त्री आणि प्रत्येक भावनाशील, चिंतनशील विनयशील व्यक्तीस महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!*
   
     इथे मी माझ्या विचारांची प्रसूती केली, एक टक्का तरी मला त्या स्त्रियांच्या प्रसूतीच्या वेदना मांडता आल्या की नाही माहित नाही? असंख्य वेदना त्यांच्या आयुष्यामध्ये आहेत त्या फक्त पुरुषांच्या समजून घेण्यामुळे कमी होऊ शकतात असे स्त्रियांना वाटत असावे असे मला वाटते.

✍️ सतीश शारदा आसाराम वराट.

राजे तुमचा फक्त वापर होतोय......






जय जिजाऊ राजे, 
राजे तुम्हाला असे वाटत असेल माझ्याकडे पाहून 21व्या शतकातला हा माणूस हा माझा मावळा हा चेहरा पाडून माझ्याकडे का आला आहे?
    राजे होय मी आधुनिक आहे मी 21व्या शतकातला मावळा पण लाज वाटते मला मी विकसित, आधुनिक, पुढारलेला, पुरोगामी सुशिक्षित माणूस आणि तुमचा मावळा म्हणून घ्यायला. 
      राजे तुम्हाला प्रश्न पडला असेल मी एवढा हताश निराश हतबल का झालो आहे?
     राजे सोळाव्या शतकामध्ये तुम्ही शून्यातून हिंदवी स्वराज्य निर्माण केले. सर्व बाजूंनी दुश्मन असताना ,अनेक संकट आणि बिकट परिस्थिती असताना तुम्ही स्वराज्य निर्माण करून आदर्श राज्यकारभार चालवला.
        राजे आता तुमच्या नंतर तुमच्या पावलावर पाऊल ठेवून तुमच्या नंतरच्या पिढ्यांनी फक्त तुमचे नाव घेणे , तुमच्या पुतळ्यांना हार घालने, तुमचे फोटो लावने, एवढंच नाही तर तुमच्यासारखा लूक ठेवणे एवढंच चालू आहे.
        इथे विश्वास केव्हाच पानिपत मध्ये मेला. नीतिमत्ता केव्हाच मलीन गंगेमध्ये वाहून गेली. आपुलकी माया जिव्हाळा हवेत जाऊन ढगात विरळून केव्हाच गेल्यात. 
     शौर्य ,जिद्द, चिकाटी आत्मविश्वास कुठे हरवून गेलेत ते कळत नाही.
        राजे इथे फक्त   अनिती नांदते आहे. भ्रष्टाचार माजला आहे, स्वार्थाने बरबटलेले लोक स्वतःच्या पोटच्या लेकीचाही गळा घोटत आहे. पैशासाठी इथे आपल्या आज लोकांना दिवसा लुटले जाते  तेव्हा आठवते राजे तुम्ही रयतेसाठी, स्वराज्यासाठी एकदा नव्हे, दोनदा नव्हे तर सात-सात वेळा सुरत लुटलेली. राजे तुमचे कष्ट रात्रंदिवस स्वराज्यासाठी झुंजून, झगडणं आणि जीव लावण आज माती मोल ठरल आहे. आग्र्यावरून पेटार्‍यातून केलेली तुम्ही सुटका, पन्हाळगडावरून विशाळगडाकडे रात्रीच्या पावसाच्या वेळी तुम्ही मावळ्यांसह सुटका केली,
एवढा मोठा संकट असताना देखील प्रतापगडाच्या पायथ्याशी सैतानी वृत्तीचा कोथळा तुम्ही बाहेर काढलात. 
     इथले राज्यकर्ते फुकटच राशन देतात हो ,तुम्ही जेवढे शेतकऱ्यांना आणि निसर्गाला जपत होते तेवढे जपत नाहीत पण राजे स्वतःच्या संपत्ती प्रॉपर्टी वाढवण्यात व्यस्त असतात आणि जपतात स्वतःला. नीतिमत्ता, माणुसकी,  पाप पुण्य, कर्तव्य असले काही प्रकार आता ऐकायला देखील मिळत नाही. राजे इथे माणसालाच माणसाची भीती वाटत आहे. इथे आपल्या आज पोराची भीती आपल्या बापाला आणि माईला वाटत आहे. राजे हे तुमच्या काळातल्या समस्या संकट खूप मोठे होते पण आता इथं छोट्या समस्या डोंगराएवढ्या वाटत आहे आणि त्या सोडवण्यातच तुमचा प्रत्येक मावळा प्राण सोडत आहे पण समस्या काही सुटत नाहीत. 
         राजे इथे पोरांना पोरी भेटत नाहीत, इथल्या पोरांना हाताला काम भेटत नाही, राजे इथल्या शेतकऱ्यांना वीज आणि पाणी मिळत नाही, आलेल्या पावसावर जे पीक येतं त्याला भाव मिळत नाही, तुमच्या काळामध्ये पोर्तुगीज इंग्रज डज फ्रेंच तुम्हाला वाकून मुजरा करायचे आणि आयात निर्यात करून आपल्या शेतमालाला चांगला भाव द्यायचे पण राजे इथली राज्यकर्ते दलाल बनले आहेत आणि मध्येच कमिशन खाऊन भ्रष्टाचारात बरबटले आहेत.
     राजे आता राजे शाही राहिली नाही आता लोकशाही आली आहे पण बरं झालं राजेशाही नाही कारण तुमच्यासारखी राजे राहिले नाही आणि लोक सुद्धा. म्हणूनच लोकशाही सुद्धा राहणार नाही. 
       राजे तुम्ही स्वतः तीनशे साडेतीनशे किल्ले बांधले, काही समुद्रा त बेटावर तर काही घाटमाथ्यावर त्यामधील तुमची राजधानी असलेला एकच किल्ला रायगड किल्ला स्वराज्याची राजधानी अन आज संपूर्ण महाराष्ट्राची राजधानी असलेली मुंबई यांची तुलना केली तर राजे आजही आपणच सरस ठरत आहात. 
    आज मुंबई मधली कुठलीही बाजारपेठ रायगड किल्ल्यावरच्या बाजारपेठेसारखी नाही, आज आमचं संपूर्ण आयुष्य टू बीएचके फोर बीएचके वरून वन बीएचके आणि वन आर के वर येऊन ठेपला आहे, राजे रायगड किल्ल्यावरती सहा राण्यांसाठी प्रत्येक वन बीएचके महल विथ टॉयलेट बाथरूम अटॅच तुम्ही सोळाव्या शतकात केल. इथं आम्हाला एका बायकोसाठी एक स्वतःची खोली बांधताना नाकी नऊ येत आहे. हम दो हमारे दो सरकारने नारा दिला असला तरीही त्यांचं पालन पोषण करणे आणि त्यांचे शिक्षण आरोग्य हे चांगल्या पद्धतीने करू शकत नाहीत. राजे आम्ही आधुनिक काळात असून सुद्धा आमच्या लेकरांना धड इंग्रजी येत नाही तुमच्या मुलाला म्हणजे छत्रपती संभाजी राजेंना आठ भाषा तसेच अनेक विद्या तुम्ही शिकवल्या, 128 युद्ध करून देखील एकही लढाई न हरलेला तुमचा पुत्र तुम्ही घडवलात पण आमचा आधुनिक युगातील मुलगा आणि मुलगी सर्व जग त्याच्या हातात असताना त्याला कोणतीच भाषा आणि कोणतीच विद्या कोणती कला आणि कौशल्य पूर्ण पारंगत करता येत नाही हे सत्य आहे. छत्रपती संभाजी राजे यांनी संस्कृत सारख्या भाषेतून दोन ग्रंथ लिहिले राजे आमचे लेकर वाचन सुद्धा करत नाहीत हो. 
       लढाया युद्ध काय हल्ली त्यांना बोलायला सुद्धा वेळ नाही. सर्वजण खूप बिझी झाले आहेत. 
राजे तुम्ही तुमचं बालपण तरुण पण जे जगलात तसं जीवन आता नाही. 
        आज माझी हे मित्र माझी सवंगडी आम्ही इथे जमलो आहोत.तेव्हा तुमचे खेळ ,तुमचे युद्ध सर्व गोष्टी आठवल्या, मा जिजाऊ साहेब यांचा संघर्ष त्यांनी पाहिलेलं स्वप्न आणि ते स्वप्न तुम्ही पूर्ण केलं, ते स्वप्न छत्रपती संभाजी राजे यांनी लिलया पेललं. आता आमची आई स्वप्न पाहत नाही आम्हीही पाहत नाही आणि आमच्या पुढील पिढीला तर स्वप्न काय असते? ऊर्जा काय असते प्रेरणा काय असते? स्वराज्य काय असते? हे कसे सांगणार?

मानव जातीचा अनोखा इतिहास , सेपियन्सचा आणि आपला आजचा आहार.

सेपियन्स, मानव जातीचा अनोखा इतिहास लेखक युव्हाल नोआ हरारी यांच्या पुस्तकातून, 
आपल्या सामाजिक मानसिक वैशिष्ट्यांना कृषीयुगापूर्वीच्या काळात आकार प्राप्त झाल्याचा दावा उत्क्रांती वादी मनोविज्ञानाचे नव्याने भरभराटीला आलेलं अभ्यास क्षेत्र करतो. आपला मेंदू आणि आपलं मन शिकार करणाऱ्या आणि फळकंदमुळे गोळा करणाऱ्या भटक्या जीवनासाठी अनुकूल आहेत असं आजही संबंधित क्षेत्रातले अभ्यासक म्हणतात. आपलं आजचं भोवताल महानगर विमान दूरध्वनी आणि संगणक यांनी व्यापला आहे आपली पूर्वज भटके शिकारी असताना विकसित झालेला आपला मेंदू आपली वर्तमानातली जीवनपद्धती ,आपल्या खाण्याच्या सवयी, संघर्ष आणि लैंगिकता या बाबी ठरत असतात.आजच्या पर्यावरणाला आपल्याला अधिक साधने स्त्रोत दिले आहेत.आपल्या आधीच्या पिढीपेक्षा आपल्याला दीर्घायुष्य लाभल आहे, पण या सर्व बाबींनीच आपल्याला अनेकदा परकेपणाची भावना,नैराश्य आणि ताण-तणाव दिले असल्याचं उत्क्रांती वादी मनोवैज्ञानिकांचे म्हणणं आहे.
      या मागची कारण शोधण्यासाठी त्यांच्या मते आपण आपल्या भटक्या शिकारी पूर्वजांचा नीट अभ्यास केला पाहिजे. कारण अजूनही आपलं अचेतन मन भटक्या शिकारी पूर्वजांसारखंच आहे उदाहरणार्थ शरीराला फारसं उपकारक नसलेलं आणि भरपूर उष्मांक असलेलं अन्न लोक का खातात? आजची समृद्ध समाज लठ्ठपणाच्या त्रासदायिक समस्येची झगडताना दिसत आहेत. विकसनशील देशांमध्ये लठ्ठपणा वेगाने पसरताना दिसतो आहे. आपल्या भटक्या पूर्वजांच्या जीवनाचा आणि त्यांच्या खाण्याच्या सवयीचा विचार करता आपण गोड आणि चरबीयुक्त पदार्थांवर का तुटून पडतो हे एक कोडेच आहे. सॅव्हानाच्या गवताळ प्रदेशात आणि अरण्यांमध्ये जिथे सेपीन्यंसची वस्ती होती त्या प्रदेशांमध्ये भरपूर उष्मांक असलेल्या गोड पदार्थाचा तीव्र तुटवडा होता.तसेच तेथे सर्वसाधारण अन्नाचीही कमतरता होती. तीस हजार वर्षांपूर्वीच्या भटक्या माणसाजवळ पिकलेली फळ हाच मिष्ठांनाचा एकमेव प्रकार उपलब्ध होता.अश्मयुगातल्या एखाद्या स्त्रीला अंजीरांनी लगडलेलं झाड दिसलं तर स्थानिक बबनुच्या कळपाने ती अंजीर फस्त करण्यापूर्वी शक्य तेवढी फळ खाऊन घेणं हीच सर्वात समंजस गोष्ट होती.भरपूर उष्मांक असलेलं अन्न खाणं हे आपल्या गुणसूत्रांमध्येच नोंदवलेला आहे. आज आपण गगनचुंबी इमारती मधल्या आपार्टमेंट मध्ये राहतो .आपल्या घरामध्ये फ्रिज भरलेले असतात पण आपल्या डीएनएच्या हिशोबाने मात्र आपण अजून सॅव्हानातच आहोत म्हणूनच आपण फ्रिज मधले आईस्क्रीम चा अख्खा डब्बा फस्त करतो आणि त्यावर कोको कोलाची भली मोठी बाटली ही पिऊन रिकामी करतो.      


  Fun constructive learning

 The unique history of mankind, sapiens and our diet today.

 April 29, 2023

 


 From author Yuval Na Harari's book Sapiens, A Unique History of Humankind, the newly burgeoning field of evolutionary psychology claims that our social and psychological traits took shape in pre-agricultural times.  Even today, scholars in the field say that our brains and our minds are better suited for nomadic life as hunters and gatherers of tubers.  Our environment today is filled with metropolises, airplanes, telephones and computers. Our brains, developed when our ancestors were nomadic hunters, shape our current lifestyles, our eating habits, conflicts and sexuality. Today's environment has given us more resources.  It is possible, but evolutionary psychologists say that all these things have often given us feelings of alienation, depression and stress.

 To find out the reason behind this, according to him, we should study our nomadic hunter-gatherer ancestors.  Because our unconscious mind is still the same as that of the nomadic hunter-gatherer ancestors. For example, why do people eat food that is not very beneficial to the body and has a lot of calories?  Today's affluent societies seem to be grappling with the troubling problem of obesity.  Obesity appears to be spreading rapidly in developing countries.  Considering the life and eating habits of our nomadic ancestors, why we crave sweet and fatty foods is a puzzle.  In the savannah grasslands and forests where sapiens lived, there was a severe shortage of caloric-rich sweeteners, as well as general food shortages.  Ripe fruit was the only form of sweetener available to the nomadic man thirty thousand years ago. If a woman in the Stone Age saw a tree covered in figs, the most sensible thing to do was to eat as much fruit as possible before the herd of local baboons devoured the figs.  .  Today, we live in apartments in skyscrapers. Our refrigerators are full, but according to our DNA, we are still in the savannah, so we open the entire ice cream box in the refrigerator and empty it by drinking a big bottle of Coco Cola.

 Health and food

लेबल: